ज्यांनी ज्यांनी गेले आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला त्याचं…; विधानसभेत मुख्यमंत्र्यांचा रुद्रावतार 

 Eknath Shinde : वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधीमंडळात निवेदन दिलं. तुम्ही जर आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणार असाल, तर या देशातील जनता आणि आम्ही सहन तो सहन करणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या आईचा अंतविधी झाल्यानंतर ते लगेच कर्तव्यावर गेले. राष्ट्रभक्ती, देशभक्ती त्यांच्या नसानसात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्यांनी ज्यांनी गेले आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला त्याचं काय? असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. कारवाई करायची असेल तर सर्वांवर झाली पाहिजे असंही ते म्हणाले.

काल राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारले, त्याचे आम्ही समर्थन केलं नाही. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल असं बोलणं देशद्रोह असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. या देशाचा मान आणि देशाची कीर्ती पोहोचवण्याच काम प्रधानमंत्र्यांनी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लोकशाही धोक्यात असेल तर भारत जोडो यात्रा कशी काढली? जम्मू काश्मीरमध्ये झेंडा फडकावला ना? असे सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला केले.