‘पवारांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळाली असती’

मुंबई  – पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपचा जलवा पाहायला मिळाला आहे. यामुळे विरोधक धास्तावले असून विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक बजावू शकतात अशी काहींना आशा आहे. यातूनच आता शरद पवारांनी (Sharad Pawar)संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.

दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारदेखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. त्यामुळे एकीकडे काँग्रेसच्या नेतृत्तावरुन वादंग सुरु असतानाच दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएच्या नेतृत्वावरुनही घमासान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आता याच मुद्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी पवारांना आणि राष्ट्रवादीला चिमटा काढला आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना UPA चे अध्यक्ष करण्याचा ठराव पारित करण्यात आला.त्याऐवजी त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर देशाच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी मिळाली असती. उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला.असं त्यांनी म्हटले आहे.