भाजप सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण सारखंच कसं दूषित होत आहे ? – सुळे

मुंबई – काही संघटनांनी आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात काल कोल्हापूर बंदची (Kolhapur ) हाक दिली होती. यादरम्यान काही परिसरात तणाव निर्माण झाला. जमावानं वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूर सोडला. सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती पसरु नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील तणावाची परिस्थिती आता नियंत्रणात असून नागरिकांनी सोशल मिडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar) यांनी केलं आहे. जिल्ह्यात येत्या 19 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश आहेत.

एका बाजूला प्रशासन शांतता राखण्याचे प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोप काही थांबत नसल्याचे चित्र आहे. कोल्हापूर आंदोलन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. त्या म्हणाल्या, भाजप सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण सारखंच कसं  दूषित होत आहे. राज्यामध्ये सारख्या दंगली होत राहिल्या तर राज्याचं नुकसान होणार आहे. राज्यामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे जनता घाबरली आणि बिथरली आहे. राज्यामध्ये होणाऱ्या दंगलींमुळे जनता घाबरली आहे आणि हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे.  असं त्या म्हणाल्या.