“भिडेंची तिरंग्याच्या विरोधात रॅली, भिडे खऱ्या अर्थाने राष्ट्रविघातक…”, काँग्रेसचा हल्लाबोल

सांगली- आज संपूर्ण भारतात ७७वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. एकीकडे भारतवासी तिरंग्याच्या उत्सवात रंगलेले असताना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी सांगलीत हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा काढली आहे. या भगवा रॅलीनंतर काँग्रेसमधून संताप व्यक्त केला जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अत्यंत कडवट शब्दांमध्ये भिडेंचा समाचार घेतला.

भारताचा राष्ट्रध्वज भगवा करण्याच्या मागणीसाठी संभाजी भिडे यांनी मंगळवारी सांगलीत आपल्या सहकाऱ्यांसह पदयात्रा काढली. ‘भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजही भगवा असावा,’ असा त्यांचा युक्तिवाद आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, “मनोहर कुलकर्णी हा माणूस तिरंग्याला विरोध म्हणून भगवी रॅली काढतो आहे. ज्यांनी त्यांना गुरुजी म्हणून संबोधलं त्या विद्यार्थ्यांची भूमिका काय, हे महाराष्ट्र बघणार आहे. देशाचे पंतप्रधान एकीकडे तिरंग्याला सलाम करतात आणि त्यांचे भक्त तिरंग्याला विरोध करतात, भगवा रॅली काढतात. यातूनच यांचा रंग कोणता हे दिसून येत आहे. या भिडेंनी राष्ट्रद्रोह केलेला आहे, भिडे खऱ्या अर्थाने राष्ट्रविघातक आहेत.”

”भिडेंवर त्वरित कारवाई झाली पाहिजे, नाहीतर हा देश सरकारला माफ करणार नाही. ज्यांनी गुरुजी म्हटलंय त्या विद्यार्थ्याची भूमिका काय असेल? हे देश बघतोय. निदान आम्ही त्यांच्या सोबत नाही हे सिद्ध होईल म्हणून तरी कारवाई करावी” अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.