ईडीचा वापर करून विरोधी पक्षातील लोकांना घाबरवलं जात आहे; नाना पटोले कडाडले

नागपूर – वादग्रस्त वकील सतीश उके(satish uke) आणि त्याचे मोठे भाऊ प्रदीप उके(pradeep uke) यांची पाच तास चौकशी केल्यानंतर ईडीच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले होते. दिवसभर सतीश आणि प्रदीप उके यांची नागपूरच्या सेमिनार हिल परिसरातील सिजिओ कॉम्प्लेक्स मधील ईडी कार्यालयात 12 तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने दोघांना कायदेशीररित्या अटक केली आहे.

त्यानंतर आता दोघांना घेऊन ईडीचे पथक विमानाने मुंबईला रवाना झाले आहेत. पुढील चौकशी मुंबईच्या कार्यालयात होणार आहे. मात्र त्याआधी सतीश आणि प्रदीप उके यांना मुंबईच्या PMLA न्यायालयात हजर करावे लागणार आहे. ईडी कडून दोघांची कस्टडी मागितली जाणार आहे.

सतीश उकेंच्या वडिलांनीही ईडीवर (ED Raid) काही गंभीर आरोप केले आहेत. सकाळी 5 वाजता ईडीचे काही अधिकारी आम्ही झोपेत असताना आमच्या घरात आले. माझ्या सुनेला अधिकाऱ्यानी धक्काबुक्की करत घरामध्ये घुसले. फडणवीस यांच्या विरोधात तुम्ही बोलत आहात. त्याचमुळे तुमच्या घरी ईडीची रेड पडत आहे, असं त्यांनी सांगितलं, असा खळबळजनक दावा सतीश उके यांच्या वडिलांनी केला आहे.

दरम्यान, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) याबाबत म्हणाले, भाजपची व्यवस्था ही अत्याचारी आहे. त्यांच्याविरोधात कोणी काही बोललं की, ईडी मागे लावली जाते. लोकांना घाबरविण्याचं ईडी हे तंत्र आहे.पटोले म्हणाले, सतीश उके हे माझे वकील होते. याचा अर्थ त्यांनी काही केलं असेल, तर त्याच्याशी माझा संबंध लावणे योग्य नाही. सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांनी या प्रकरणी सुमोटो कारवाई करावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. तसेच ईडीचा वापर करून विरोधी पक्षातील लोकांना घाबरवलं जात असल्याचंही ते म्हणाले.