महाराष्ट्राने पाहिलेले हे सर्वात वाईट, संधिसाधू, भ्रष्ट आणि कुचकामी सरकार आहे – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला आज २ वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्राला लुटणारे आणि मतदारांचा विश्वासघात करणारे हे सरकार आहे. त्यामुळे ती केवळ ‘महा वासूली आघाडी’ नाही तर ‘महा विश्वासघातकी आघाडी’ देखील आहे अशी टीका माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

ते म्हणाले, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीकरण हे या सरकारचे वैशिष्ट्य आहे. अनेक मंत्री, खासदार, आमदार यांची भ्रष्टाचाराबाबत चौकशी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या जवळच्या लोकांवर आयकर छापे टाकून 1000 कोटींची ‘बेनामी’ मालमत्ता उघड झाली आहे. सामान्य माणसाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसर्‍या मंत्र्याने मुंबई बॉम्ब स्फोटाच्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्याकडून कवडीमोल भावाने जमीन खरेदी केली आहे. चौथ्या मंत्र्यावर आपल्या जावयाला किफायतशीर कंत्राटे दिल्याचा आरोप आहे, जे शेवटी रद्द करावे लागले.

मुख्यमंत्री क्वचितच मुख्यमंत्री कार्यालयात जातात. महाराष्ट्र प्रथमच एक ‘अपघाताने’ झालेले आणि ‘गैरहजर’ मुख्यमंत्री अनुभवत आहे! निवडणूक प्रतिज्ञापत्रात खरे उत्पन्न आणि मालमत्ता जाहीर न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या पीएने सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बंगला बांधला. आरोप झाल्यानंतर त्याने स्वतःचा बंगला पाडला. शिवसेनेच्या आणखी एका मंत्र्याने सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट उभारले आणि ते पाडण्याऐवजी त्यांनी ते विकले हे महत्त्वाचे आहे. शिवसेनेच्या एका प्रमुख खासदारावर पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेकडून मैत्रीपूर्ण कर्ज घेतल्याचा आरोप आहे. ईडीची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कर्जाची परतफेड केली. सहकार क्षेत्रातील गैरव्यवहारप्रकरणी आणखी एका खासदाराला अटक झाली आहे. अजून एका खासदारावर कंत्राटदारांकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे. तिच्या साथीदाराला अटक करून मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मराठवाड्यातील एका मंत्र्याची चौकशी सुरू आहे असं देखील त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, राज्याचे गृहमंत्री ६ महिने फरार होते, आता तुरुंगात आहेत. अशा प्रकारच्या अराजकतेची स्थिती नागरिक समजूच शकत नाहीत. मुंबईतील क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या (CIU) प्रमुखावर बॉम्ब पेरणे आणि मित्राच्या हत्येचा आरोप आहे. या प्रकरणी आणखी ४ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक होऊन तेही तुरुंगात आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांनी सत्ताधारी प्रशासनावर मोठ्या प्रमाणात खंडणीचा आरोप लावला. ते 9 महिने फरार असणे किंवा त्यांना फरार व्हावे लागणे हि गंभीर स्तिथी आहे. महाराष्ट्रातील शासनाची इभ्रत पुरती धुळीस मिळाली आहे.

राज्यात संपूर्ण अराजकता आहे. एकट्या मुंबईत 700 हून अधिक महिलांवर बलात्कार झाले आहेत. एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि हवामानामुळे प्रभावित झालेल्या शेतकर्‍यांना कोणतीही अर्थपूर्ण मदत मिळालेली नाही. पेट्रोलवरील व्हॅट कमी न करणाऱ्या सरकारने विदेशी मद्यावरील अबकारी शुल्कात मोठी कपात केली आहे. लसींच्या उपलब्धतेच्या कमतरतेचे आरोप करणारे हे सरकार आता २ कोटीं हुन अधिक लसींचा साठा करून त्या वाया घालवत आहे असं ते म्हणाले.

अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये हिंसाचार करणाऱ्या रझा अकादमीला सरकारने मोकळा हात दिला आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत सरकारची ऐतिहासिक चूक अक्षम्य आहे. मेट्रो रेल्वेला उशीर झाला असून राज्य परिवहनचा संप आता जवळपास महिनाभर सुरू आहे. शासन करण्याची इच्छाशक्ती सरकारने गमावली आहे.सर्व नैतिकता बाजूला ठेऊन आणि मतदारांचा आणि जनतेच्या जनादेशाचा विश्वासघात करून केवळ सत्तेसाठी हे सरकार स्थापन केले.  शिवसेना भाजपचा मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढली. सर्वत्र नरेंद्र मोदींचे पोस्टर लावून ते जिंकले. त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आणि मोदी विरोधकांशी हातमिळवणी केली. शिवसेनेला पराभूत करण्यासाठी मते मागणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या सत्तेच्या हव्यासा पोटी  शिवसेनेशी  हातमिळवणी केली. महाराष्ट्राने पाहिलेले हे सर्वात वाईट, संधिसाधू, भ्रष्ट आणि कुचकामी सरकार आहे अशी घणाघाती टीका देखील त्यांनी केली.