महाविकास आघाडी मुख्याध्यापकांच्या मागण्यांनुसार शैक्षणिक धोरणात सकारात्मक बदल करेल – अतुल बेनके

पुणे : शिक्षणाची परंपरा अबाधित ठेवत शिक्षक वेळप्रसंगी खिशातून पैसे खर्च करून पटसंख्या टिकविण्यासाठी प्रयत्न करतात. शिक्षक भरती, वेतन, अनुदान,शिपायांच्या रिक्त जागा, कमी वेतन, संचमान्यतेतील समस्या, आधारकार्ड जुळवणी अशा अनेक अडचणी मुख्याध्यापक व शिक्षकांना आहेत. या मागण्या येत्या अधिवेशनात मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. अभ्यासपूर्ण पद्धतीने हे प्रश्न सोडवून महाविकास आघाडी मुख्याध्यापकांच्या मागण्यांनुसार शैक्षणिक धोरणात सकारात्मक बदल करेल, असे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ यांच्या ६० व्या हीरक महोत्सवी राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशनाचे आयोजन पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन ओझर, जुन्नर येथील श्री क्षेत्र विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या सांस्कृतिक भवनात झाले. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन, महामंडळाच्या फेसबुक, यु टूब पेजचे अनावरण आणि अँपचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला अधिवेशनाचे अध्यक्ष मुख्याध्यापक डॉ.आर.डी. कदम, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, विघ्नहर देवस्थान ट्रस्ट ओझरचे गणेश कवडे, माजी आमदार भगवान साळुंके, महामंडळाचे अध्यक्ष जे.के.पाटील, सचिव शांताराम पोखरकर, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, सचिव सुरेश कांचन, चंद्रकांत मोहोळ, महेंद्र गणपुले, सुभाष माने, अरुण थोरात, ज्ञानेश्वर म्हात्रे, आदिनाथ थोरात, हनुमंत कुबडे, तबाजी वागदरे, नंदकुमार सागर, प्रा.अविनाश ताकवले, मधुकर नाईक, प्रसाद गायकवाड, शिवाजी किलकिले आदी उपस्थित होते. या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून साधारण १५०० ते २००० माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी १ लाख रुपयांची देणगी दिली.

अतुल बेनके म्हणाले, कोविड काळात शिक्षकांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. याशिवाय मतदानापासून ते स्वयंपाकापर्यंत सर्व कामे करण्याकरिता शिक्षक पुढे असतात. महाराष्ट्रातील नव्या पिढीला सुसंस्कृत, सुशिक्षित करण्याकरिता शिक्षक नेहमी पुढाकार घेतात. शिक्षण संस्थाना लाईटबील व्यावसायिकरित्या नाही तर वेगळ्या कमी दराने आकारण्यात येत आहे. ज्यांना जादा बिल येत असेल,त्यांनी महावितरणाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

डॉ.आर.डी.निकम म्हणाले, इंग्रजीसोबत मराठी माध्यमाच्या शाळा टिकवायच्या असतील, तर सरसकट अनुदान मिळण्याची आवश्यकता आहे. वेतन त्रुटी, पोषण आहार हा अनेक समस्या आहेत. शासन, शिक्षक, पालक व विद्यार्थी या सर्वांशी मुख्याध्यापक समन्वय आढतात. त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची आहे.

जे.के.पाटील म्हणाले, शिक्षण व्यवस्था कठीण काळातून जात आहे. ऑनलाईन पद्धती असली, तरी वर्गातील अध्यापनाला पर्याय नाही. शिक्षक भरती, अनुदान, पेन्शन अशा अनेक समस्या आपल्यासमोर आहेत. त्यामुळे ता सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे.

हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले, शिक्षण क्षेत्र, मुख्याध्यापक, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याकरिता महामंडळाची स्थापना करण्यात आली. शिक्षणातील प्रश्न सोडवून शिक्षण क्षेत्राला योग्य दिशा देण्याचे काम करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले.