आम्ही जी भूमिका घेतली आहे त्या निर्णयावर निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करेल – Sunil Tatkare

मराठा समाजाच्या भावना समजून सरकार पुढची पावले उचलण्याचा निर्णय घेत आहे...

Sunil Tatkare – आम्ही एनडीए आणि राज्यात महायुतीमध्ये सहभागी होण्याची जी भूमिका घेतली आहे त्या निर्णयावर निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.

आज पक्ष प्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांशी संवाद साधला. २ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीमध्ये सामील होण्याचा सामुहिक निर्णय पक्षाच्या वरीष्ठ मंडळींनी एकत्र बसून घेतला. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय आणि निवडणूक आयोगाने अलीकडच्या काळात दिलेला निर्णय याची कायदेशीर, वैधानिक पूर्णपणे खात्री करून हा निर्णय घेतल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान राष्ट्रीय निवडणूक आयोग, लोकसभा अध्यक्षांकडे आमचे म्हणणे दिलेले आहे. निवडणूक आयोगाकडे योग्य प्रकारचा निर्णय होईल असेही सुनिल तटकरे म्हणाले. आम्ही पहिल्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका ठेवली ती कालही होती, आजही आहे, आणि उद्याही राहील असे स्पष्ट करतानाच एकंदरीतच कायद्याद्वारे, सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार ५४ टक्के आरक्षणाची मर्यादा आहे. ओबीसींना आरक्षण राखून ठेवूनच त्यांचा जो हक्क आहे तो राखून ठेवून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे असे आमचे मत आहे आणि हीच मतप्रणाली सरकारच्या पुढे आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांनी उपसमितीची बैठक घेऊन मराठा समाजाच्या याबद्दलच्या भावना समजून पुढची पावले उचलण्याचा निर्णय घेतल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत प्रत्येक देशभक्त स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन यादिवशी ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा देतो. त्यामुळे आज विरोधकांकडून जी टिका केली जात आहे ती अनाठायी आहे.

भारत हा माझा देश आहे असे शिकतच लहानपण सर्वांचे गेले. भारतीय शब्दावरून जे आज वेगवेगळे विचार मांडले जात आहेत. प्रत्येक नागरिकाला आजपर्यंत आपण देशाबद्दल संबोधित करत आलो.’ इंडिया’ हे नाव कदाचित यापूर्वीच्या ब्रिटिशांच्या कालावधीत किंवा इंग्रजी व्हर्जन असू शकेल. हिंदीमध्ये ‘भारतमाता की जय’ आणि मराठीतही बोलतो. त्यामुळे यावर टिका करण्यापेक्षा हा विचार, हे स्वागतार्ह आहे ही भूमिका सर्वांनी घेतली तर निश्चितच योग्य राहील असेही मत सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या – 
सनातन धर्माच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या उदयनिधीच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडे तक्रार दाखल